१ येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला :
२ “स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे; त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली;
३ आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावण्याकरता त्याने आपले दास पाठवले; परंतु ते येईनात.
४ पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांना म्हटले की, ‘आमंत्रितांना असे सांगा, पाहा, मी जेवण तयार केले आहे; माझे बैल व पुष्ट पशू कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला.’
५ तरी ते मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले,
६ आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना जिवे मारले.
७ तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले.
८ मग तो आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते.
९ म्हणून तुम्ही चवाठ्यांवर जाऊन जितके तुम्हांला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा.’
१० मग त्या दासांनी रस्त्यांवर जाऊन बरेवाईट असे जितके त्यांना आढळले त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मांडव जेवणार्यांनी भरून गेला.
११ मग राजा जेवणार्यांना पाहण्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला.
१२ त्याला तो म्हणाला, ‘मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास?’ त्याला काही उत्तर देता येईना.
१३ तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, ‘ह्याचे हातपाय बांधून ह्याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल.’
१४ कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.”
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.